मुंबई!! स्वप्नांची नगरी, आणि प्रचंड विरोधाभासाचीही. इथे गगनचुंबी इमारतीच्या तळाला विस्तीर्ण पसरलेल्या झोपडपट्ट्या आहेत. आधुनिक उड्डाणपूलाखालीच बारदानावर झोपणारे गरीब मजूर आहेत. देशातील सर्वाधिक कार्यक्षम पोलीस असलेल्या या नगरीत भारतातील नामचीन खुखार गुंड आहेत इतका विरोधाभास असुनही सदैव घड्याळ्याच्या काट्यावर अविरत धावणारी ही उद्यमनगरी, देशातील इतर भागातील लोकांना एखाद्या चुंबकासारखी आकर्षित करते. दर दिवशी स्थलांतरित लोकांचे लोंढे या शहरावर आदळतात. या सर्व लोकांच्या डोळ्यात स्वप्नं असतात ती श्रीमंती आणि समृध्दीची. कष्ट केल्यास हे शहर निदान उपाशी तर ठेवत नाही हा अदम्य विश्वास उरात असतो. हा विश्वास आणि आशा मनात घेऊनच ते स्वप्नांच्या मृगजळामागे धावतात. काही मोजक्या भाग्यवंतांना ती गवसतात पण, परंतु इतर दुर्दैवी जीव मात्र उर फुटेपर्यंत धावतात तरीही ते मृगजळ त्यांच्यापासून दूरच पळतं. नियती प्रत्येकाच्या भाग्याचे पत्ते इमानाने पिसून वाटते. काहींच्या आयुष्याच्या रमीचा डाव सहजपणे लागतो, तर काहींचा रडतखडत लागतो. बऱ्याच जणांचा तर शेवटपर्यंत लागंतच नाही. असं असलं तरी हा डाव अर्धवट सोडून जाण्याचं स्वातंत्र्य नाही. दैवाचा अदृष्ट रेटा मागं असल्यानं वाट्याला आलेलं भागधेयाचं प्राक्तन स्विकारण्याखेरीज दुसरा काहीच पर्याय त्यांना उरत नाही.
१९७८ साली प्रदर्शित झालेल्या व मुझफ्फर अली दिग्दर्शित गमन या चित्रपटात अशाच गुलाम हसन (फारुख शेख) नावाच्या स्थलांतरित शेतमजुराची व्यथा मांडली आहे. उत्तर प्रदेशातील एक छोटं कोतवारा हे याचं मुळचं गाव. वडिलोपार्जित शेतजमीन गावातील थनदांडगा ठाकूर हडपतो. गावातील मिलमध्ये नोकरकपात चालू आहे. हाताला काम नाही आणि घरी आजारी आई त्याच्या बेकारीवर टोमणे मारते. बिकट परिस्थितीने त्याला पुरतं घेरलंय. त्यातल्या त्यात निदान बायको खैरून (स्मिता पाटील) ही सोशिक आहे आणि तिचा त्याला आधार आहे. मुंबईत काम करणारा लालूलाल (जलाल आगा) हा गावात येतो आणि त्याची हलाखीची परिस्थिती पाहून त्याला मुंबईत काम देण्याचं आश्वासन देतो. हताश गुलाम अखेर आईच्या व बायकोच्या विरोधाला न जुमानता गाव सोडतो. घर सोडताना बायकोच्या डबडबलेल्या अश्रूभरल्या डोळ्यात बघायचंही धाडस त्याला होत नाही. अंथरूणाची एक वळकटी आणि पत्र्याची पेटी घेऊन विषण्ण मनानं मुंबईला उतरतो. त्या क्षणापासून मुंबईत हातावर पोट ठेवून, निरंतर धावणाऱ्या काळाशी व्यर्थ स्पर्धा करत, आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अगणित स्थलांतरितांच्या लोंढ्यांतील एक क्षुद जीव होतो. काही दिवसांनी त्याला टॅक्सी ड्रायव्हरचं काम मिळतं . या भाऊगर्दीतही त्याचं संवेदनशील मन शाबूत आहे. या मोहमयी नगरातील ओसंडून वाहणारी गर्दी, ती गर्मी, डोळे दिपवणारी झगमगाटी श्रीमंती आणि तिच्या जवळच वसलेलं झोपडपट्टीचं आणि फुटपाथवरच्या गरिबांचं गलिच्छ आणि दयनीय जग हे पाहून तो अंतर्यामी अस्वस्थ होतो. आपल्या पोटात असंख्य माणसांची गर्दी कोंबून घेत धडाधडा धावणाऱ्या लोकल्स आणि त्यांच्यातील घामट गर्दीत वावरणारे भिकारी, आंधळे सूरदास आणि लोकलखाली एखादा माणुस आला तरी आता लोकल लेट होणार म्हणून चरफडणारी माणसं यांचं विषण्ण दर्शन त्याच्या मनाला चटका देतं. इथं वेळेला आणि पैशाला किंमत आहे, माणसाला नाही.
गावाकडून बायकोची पत्रं येतच असतात. आजारी आईच्या उपचारासाठी पैशाचा तगादा मागं असतो. रात्रंदिवस टॅक्सी चालवुनही फार कमाई नाही. गावाला जावून यावं म्हटलं तरी या लांबच्या प्रवासासाठी जवळ पैसे नाहीत. पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षासारखी त्याच्या हळव्या मनाची तडफड होते. शहरयार यांची समर्थ लेखणी त्याच्या या अस्वस्थ आणि बेचैन मनस्थितीचा अचुक वेध घेते. मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी चालवताना पार्श्वभूमीवर हे गाणं सुरु होतं.....
इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यों है
दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूँढे
पत्थर की तरह बेहिस-ओ-बेजान सा क्यों है
तनहाई की ये कौन सी मंज़िल है रफ़ीक़ों
ता-हद्द-ए-नज़र एक बयाबान सा क्यों है
क्या कोई नई बात नज़र आती है हम में
आईना हमें देख के हैरान सा क्यों है
सीने में जलन आँखों में तूफ़ान सा क्यों है
इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यों है
काळजात ही कसली विलक्षण अस्वस्थ करणाऱ्या जळजळीची अनुभूती आहे आणि डोळ्यात हे वादळी तूफान का भिरभिरतेय? या शहरातील प्रत्येक शापीत जीव का त्रस्त आहे?
जिवंत राहण्याचा कोणताही बहाणा शोधणारं हे ऱ्हदय आज एखाद्या निर्जीव आणि अविचलित दगडासारखं संवेदनाहीन का झालंय? काळजावर चरे ओढणाऱ्या या एकटेपणाच्या अमीट वेदनेला काही अंत आहे की नाही? या विदग्ध करणाऱ्या वेदनेची काही परिसीमा आहे की नाही? दूरदूर नजरेच्या टप्प्यात यापासून सुटका दिसत नाही. दैवाच्या क्रूर फटकाऱ्यांनी घडवलेला आमच्यातील ह्या बदलांचं प्रतिबिंब पाहून मनाचा आरसा का गोंधळला आहे?........
प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नावर प्रश्न... या प्रश्नावर उत्तर नाही. या वेदनांना अंत नाही आणि त्याची कुणाला खंतही नाही. या चक्रव्यूहात शिरता येतं पण मग मागं बाहेर पडायचा मार्ग बंद होतो आणि हरत चाललेली अस्तित्वाची लढाई लढणं हेच केवळ नशिबात उरतं ...
अतिशय ज्वलंत शब्दांतून एकटेपणाची उसासी व्यक्त करणारं हे गाणं पार्श्वभूमीवर चालु असताना पडद्यावर टॅक्सी चालवणाऱ्या गुलाम हसनचा भकास आणि विदीर्ण चेहरा बघून काळजात चर् होतं हे कसलं किड्यामुंग्याचं जीणं?त्याच्या चेहऱ्यावर आतमध्ये घोंघावणाऱ्या वादळाचं सावट पाहून मन हेलावतं. मुझफ्फर अलीचा कॅमेरा टॅक्सीच्या पुढच्या काचेतून दिसणाऱ्या मुंबईच्या अनेकविध पैलूंचे भेदक दर्शन घडवतो. त्यात सिगनल्सच्या उघडझापेबरोबर अविरत वाहणारी माणसांची आणि वाहनांची गर्दी, उर फोडून ओझी ओढणारे मजूर, फुटपाथ गिळणाऱ्या झोपडपट्ट्या, त्यातील माणसांचे फुटपाथवरच चालणारे आंघोळीसारखे व्यवहार अशा अनेक विदारक गोष्टी आणि एकंदरीतच या शहराची उसवलेली सामाजिक वीण याची मनस्वी अनुभूती दिग्दर्शक देतो.
अर्थ भारीत गीतरचना, जयदेव यांचे सोपं पण मनाला भावणारं संगीत, गायक सुरेश वाडकरांचे अप्रतिम सादरीकरण या सर्वांच्या जोडीला समर्थ चित्रीकरण आणि अभिनय या सर्व घटकांची भट्टी छान जमली आहे म्हणूनच एका अविस्मरणीय गाण्याचा जन्म झालाय.


गमन १९७८
कलाकार : फारुख शेख, स्मिता पाटील, जलाल आगा, गीता सिध्दार्थ, नाना पाटेकर, सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे
गीतकार :शहरयार
संगीत : जयदेव
निर्माता दिग्दर्शक :मुजफ्फर अली
No comments:
Post a Comment